२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३३२ कुटुंबे राहतात. एकूण १५७५ लोकसंख्येपैकी ७७७ पुरुष तर ७९८ महिला आहेत. ० ते ६ वयोगटातील बालकांची संख्या १५६ असून त्यामध्ये अंदाजे ८० मुलगे व ७६ मुली आहेत.
मुख्यतः आदिवासी (वारली, कातकरी) व काही प्रमाणात कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर व इतर मजुरी काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन व बकरीपालन सुद्धा करतात.
श्रावण महिन्यात गणपती उत्सवाच्या अगोदरपासून जेव्हा ढग गडगडाट करतात आणि विजा चमकत असतात तेव्हा पावसाच्या सरी कोसळत असलेल्या एका वेगळ्याच नैसर्गिक वातावरणात एक नैसर्गिक भाजी रानात उगवत असते तिलाच अळंबी संबोधले जाते.
ही भाजी अत्यंत चवदार व पौष्टिक असते. ही भाजी जेव्हा उगवते तेव्हाच लगेच काढावी लागते अन्यथा ती लगेच फुलून खाण्यासाठी अयोग्य होते. पहाटे लवकर उठून ही भाजी शोधून फुलण्याअगोदर खुडून काढून साफ करून ती लगेचच बाजारात विक्रीसाठी न्यावी लागते.
आदिवासी बांधवांना पावसाळ्यात या माध्यमातून अल्पकालीन रोजगार उपलब्ध होतो.